बुलढाणा, दि. २७ : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची आज केंद्रीयआयुष, आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला देवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
दि. २७ सष्टेबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी फाटा, बोराखडी गंडे, चांगेफळ, देवखेड, रुम्हणा शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केला. सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस सुरू असतानाही त्यांनी अंगात रेनकोट घालून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानीची पाहणी करुन प्रशासनाला तात्काळ पंचनाम्ये करण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच शेतकरी बांधवांशी संवाद साधला. नैसर्गिक संकटाला आपण सर्वच सामोरे जावु, सरकार तुमच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यादृष्टीकोणातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीची भरपाई त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
यावेळी माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे यांच्यासह पदाधिकारी, महसूल, कृषी, गटविकास अधिकारी अन्य विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

